वारकऱ्यांना कसलीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदे

वारकऱ्यांना कसलीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदे

 

बारामती:-  आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यास पाणी,  स्वच्छता,वाहतूक व्यवस्था,रस्ते, रस्ता सुरक्षा,आरोग्य सुविधा,वीज पुरवठा,शौचालय,हिरकणी कक्ष आदी सर्व सोयी-सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्या सह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतांपासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश तहसीलदार गणेश शिंदे यांनी शुक्रवारी दिले.

       पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित श्री संत तुकाराम महाराज व संत सोपान काका पालखी सोहळा आढावा बैठकीत त्यांनी वरील सूचना दिल्या. 

         यावेळी गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी नंदन जरांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, विस्तार अधिकारी भीमराव भागवत यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

       तहसीलदार शिंदे म्हणाले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी.स्वच्छते साठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिकप्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.पालखी सोहळ्या  दरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.  

       पालखी मार्गावरील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी.वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. 

        पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था उत्तम राहील याची काळजी घ्यावी.पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत समन्वय ठेवावा, असे निर्देश श्री.शिंदे यांनी दिले.

      डॉ.अनिल बागल म्हणाले, वारी कालावधीत वारकऱ्यांची सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका प्रशासनाने काम करावे.टँकरमधील पाण्या च्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी.पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरणही निटपणे होईल याकडे लक्ष द्यावे.पालखी मार्गावर निवारा कक्ष,हिरकणी कक्ष,सुरक्षित अखंड विद्युत पुरवठा,कचरा कुंडी आदी  पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे,असे डॉ. बागुल म्हणाले. 

      पो.निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील म्हणाल्या,आपत्तीच्या काळात घडलेल्या घटनेबाबत प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी.पोलीस प्रशासनाच्या वतीने आपत्तीच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,असेही श्रीमती पाटील म्हणाल्या.

     या बैठकीत पालखी सोहळ्या च्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीबाबत तालुक्यातील सर्व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.