
केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
पुणे:- केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. 'लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व असलेले दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे असं त्यांनी सांगितले.