
वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
शुक्रवार, १८ जुलै, २०२५
Edit
मुंबई:- मुंबईतील वांद्रे
परिसरात आज (शुक्रवार, १८ जुलै २०२५) पहाटे तीन मजली चाळ कोसळली असून अनेक
रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सात
जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना मुंबई
महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका
अधिकाऱ्याने दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या महितीनुसार, वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरातील चाळ क्रमांक
३७ सकाळी ०६.०० वाजताच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई
पोलिसांच्या पथकांसह आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ७ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर
काढण्यात आले. तर, आणखी तीन जण ढिगाऱ्यात अकडल्याची भिती व्यक्त केली जात
आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती अग्निशमन
दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.