महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारीखच सांगितली…

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारीखच सांगितली…

 

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागेल, असा दावा भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. इतर पक्षातील शहरातील जे माजी नगरसेवक भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यांच्या नावावर अगोदर स्थानिक गाभा समितीचे (कोअर कमिटी) एकमत होईल. त्यांचे एकमत झालेली नावे पुढे प्रदेशकडे पाठवली जातील. तशी नावे काढण्याचे काम सुरु असल्याचेही चंद्रकांत पाटील सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी पिंपळेसौदागर येथे बैठक घेतली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, प्रदेश सचिव राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, शहर सरचिटणीस विकास डोळस, युवक अध्यक्ष दिनेश यादव यावेळी उपस्थित होते.

उमेदवार अर्ज आणि उमेदवारी निश्चितीबाबत चर्चा झाल्याचे सांगून मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, २० किंवा २२ डिसेंबरला महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेल. आजपासून जो मागेल त्याला उमेदवारी अर्ज दिला जाईल. पुढील चार दिवस उमेदवारी अर्ज भरुन घेतले जातील. अर्ज देण्यासाठी कोणतेही शक्तीप्रदर्शन करायचे नाही. स्वत: इच्छुकाने पक्ष कार्यालयात येऊन अर्ज द्यावा. या अर्जांची छाननी केली जाईल. ते सर्व अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविले जातील.

एका खासगी संस्थेच्या माध्यमातून अर्जानुसार प्रत्येकाचा सर्व्हे केला जाईल. सर्व्हेच्या आधारे कोणाचे नाव पुढे आहे, त्यानुसार क्रमांक टाकले जातील. पूर्णपणे सर्व्हेच्या आधारे उमेदवारीचा निर्णय केला जाणार नसून त्याला आधार मानले जाईल. कोण निवडून येईल याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेतले जाईल. सर्व्हे आणि पदाधिकाऱ्यांचे मत ९० ठिकाणी जुळते. दहा ठिकाणी जुळत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ९० टक्के नावांबाबत एकमत झाले, तर त्यात प्रदेश नेतृत्व कोणताही हस्तक्षेप करणार नाही. प्रदेशकडून अंतिम मान्यता दिली जाईल. उमेदवार निश्चित होताच जाहीर केले जातील, असेही चंद्रकांत पाटील सांगितले.

स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य

नगरपरिषदेच्या निवडणुकीत ७० टक्के ठिकाणी युती झाली. ३० टक्के ठिकाणी झाली नाही. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका देश, राज्यावर परिणाम करणाऱ्या असतात. त्यात युती होत असते. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला सातत्याने तडजोड करावी लागते. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागते. या स्वातंत्र्याचा कार्यकर्ते गैरफायदा घेत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. महापालिका निवडणूक युतीमधून लढविण्याचा प्रयत्न राहील. युती झाली नाही, तर मित्र पक्षांवर टीका करायची नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

इच्छुकांनी मोरवाडीतील पक्ष कार्यालयात अर्ज करावेत. एकट्या इच्छुकाने अर्ज घेऊन यावे. अर्जासोबत पूर्ण माहिती द्यायची आहे. मंगळवारपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.