अमेरिकेशी कराराचा परिणाम भारताच्या शेती उत्पादनावर होणार?; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेशी कराराचा परिणाम भारताच्या शेती उत्पादनावर होणार?; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

 

बारामती- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराची जागतिक पातळीवर चर्चा आहे. या कराराचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी २ दिवस लागतील. परंतु या कराराचा परिणाम भारतीय कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे असं सांगत शरद पवारांनी करारावर चिंता व्यक्त केली. 

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, जागतिक पातळीवर अमेरिकेने भारतातवर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे. अमेरिका आणि भारतातील या नव्या कराराचे स्पष्ट चित्र आणखी २ दिवसांत देशासमोर येईल. त्यानंतर त्यावर सविस्तर भाष्य करणे योग्य होईल. परंतु आज जे लोकांसमोर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे. अमेरिका हा शक्तीशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात इतर देशात करायची ठरवली तर त्या देशाच्या त्या क्षेत्रातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.

सभागृहात चर्चा व्हायला हवी होती
 
मनोज नरवणे हे देशाचे लष्करप्रमुख होते. त्यांनी काही लिखाण केले असेल आणि त्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते करत असतील तर हा त्यांचा अधिकार आहे. आज कारण नसताना देशात संशयाचे वातावरण होतंय. लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवले आहे त्याचा अर्थ काही तरी चिंतेची स्थिती आहे. त्याची चर्चा झाली असती तर लोकांना वस्तूस्थिती कळली असती. मनोज नरवणेंचे पुस्तक प्रकाशित झाले नाही परंतु जर माझ्या हातात त्या पुस्तकाची कॉपी आहे ती मी दाखवली. अध्यक्षांनी सांगितले हे अधिकृत करा, तेही केले. तर त्यावर चर्चा व्हायला हवी होती असंही शरद पवारांनी म्हटलं. 

दरम्यान, सभागृहात जेव्हा अंदाजपत्रक जाहीर होते, तेव्हा माझी गैरहजेरी आजपर्यंत कधी झाली नव्हती. पण दुर्दैवाने कौटुंबिक आघातामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मला यावेळी मिळाली नाही. पण जे काही वाचले त्यात २-३ गोष्टी दिसतात. सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी अंदाजपत्रातून जाणीवपूर्वक टाळल्या आहेत. या अंदाजपत्रकामध्ये विकासाला अधिक ठोस गती येईल असं काही नाही असं शरद पवारांनी आरोप केला.