"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" एलपीजी टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका

"मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का?" एलपीजी टंचाईवरुन उद्धव ठाकरेंची टीका

 

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर प्रहार

उद्धव ठाकरे म्हणाले की, "गॅस टंचाई कुठेही नाही तर लोक रस्त्यावर का दिसत आहेत. मुंबईतील तब्बल ४० टक्के रेस्टॉरंट्स गॅस टंचाईमुळे बंद पडली आहेत. सर्वसामान्य जनता होरपळत आहे, पण हे जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या यंत्रणेत काहीतरी मोठा घोळ आहे. जर मुख्यमंत्री जनतेच्या व्यथा जाणून घेत नसतील, तर राज्याचे भविष्य कठीण आहे," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधानांनी सांगितलेले प्रयोग लोकांनी करून पाहिले आहेत, आता युद्धाचे परिणाम आणि महागाईवर पंतप्रधान कधी बोलणार? असा सवालही त्यांनी केला.

युद्ध आणि गॅस टंचाई; केंद्राचे स्पष्टीकरण

पश्चिम आशियातील (युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे केंद्राने आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत नवीन आदेश लागू केला असून, गॅसचा पुरवठा प्राधान्य क्रमानुसार वळवला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत सांगितले की, घरगुती गॅसचा पुरवठा सुरक्षित असून वितरणाची वेळ बदललेली नाही. साठेबाजी रोखण्यासाठी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर तात्पुरते निर्बंध लादले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. "राज्यात गॅसचा कोणताही तुटवडा नाही. विरोधक, विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे गट जाणीवपूर्वक अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. लोकांनी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने काम करत असून उत्पादनात वाढ करण्यात आली आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर केंद्राला धारेवर धरले आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला हा संकटकाळ आहे. केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे, त्यावर सरकारने स्पष्ट भूमिका मांडायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.