बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!
बारामती: बारामतीत विक्रमी मताधिक्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला सामना!!, हेच राजकीय वास्तव २३ एप्रिल २०२६ रोजी समोर आले.पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जागतिक विक्रमी मतदान झाले. पश्चिम बंगाल मधल्या मतदारांनी तर मतदानाचा ९० % आकडा गाठला. तामिळनाडूचे मतदार बंगाली मतदारांपेक्षा थोडेच कमी पडले. पण त्यांनी ८६ % चा आकडा ओलांडला. कुठल्याच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एवढे विक्रमी मतदान कधीही झाले नव्हते, ते विक्रमी मतदान बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या मतदारांनी घडवून आणले.
बारामतीत मतदारांची मतदानाकडे पाठ
त्या तुलनेमध्ये बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत फारच कमी मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांमधल्या मतदारांनी ६0 % आकडा सुद्धा ओलांडला नाही. बारामतीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत फक्त ५२.४४ % मतदान नोंदले गेले, तर राहुरी ५०.६८ % मतदान नोंदले गेले. पुढच्या तासाभरात साधारण ४ % मतदानाची वाढ धरली तरी दोन्ही मतदारसंघांमध्ये ५५ % मतदान झाले एवढेच नमूद करावे लागेल.
- विक्रमी मताधिक्य दूरच
याचा अर्थ पवार कुटुंबीयांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचा बांधलेला चंग बारामतीतल्या मतदारांनी हाणून पाडल्याचेच उघड झाले. उन्हामुळे मतदान कमी झाले म्हणावे तर बारामती आणि राहुरी पेक्षाही जास्त तापमान पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू होते तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी मतदानाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याउलट पवार कुटुंबीयांनी सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीसाठी आकाश पाताळ एक केले, पण मतदारांना घराबाहेर काढून प्रत्यक्ष मतदान करवून घेण्यात पवार कुटुंबीयांना अपयश आले. आता सुनेत्रा पवार बहुमताने निवडून आल्या तरी ते विक्रमी असण्याची शक्यता कमी असून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूक निकालांनी बारामतीचा निकाल पूर्ण झाकला जाण्याची शक्यता आहे.
- पवारांचा कौटुंबिक कलगीतुरा
पण हे सगळे घडत असताना म्हणजेच बारामतीत मतदान सुरू असताना पवार कुटुंबीयांमध्येच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे समोर आले. त्याची सुरुवात जय पवारांनी सकाळीच करून दिली. २०२९ च्या निवडणुकीत आपण स्वतःच उमेदवारी करावी अशी बारामतीकरांची मागणी असल्याचा दावा जय पवारांनी करून कुटुंबीयांमध्ये मतभेदाची ठिणगी टाकली. त्यापाठोपाठ रोहित पवारांनी पुढची निवडणूक पवार विरुद्ध पवार होईल, असा एल्गार केला. पण श्रीनिवास पवार यांनी जय पवार आणि रोहित पवार यांचे कान टोचले. तर अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढविणे ही आपली चूक होती, अशी कबुली युगेंद्र पवारांनी देऊन टाकली. शरद पवार आपल्या दोन्ही नातवांना परस्पर वक्तव्य केल्याबद्दल जाब विचारतील, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. त्यानंतर जय पवारांनी आपले सकाळचे वक्तव्य फिरविले. बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत व्हावी, अशी कुणाचीच इच्छा नसल्याचे ते म्हणाले. पण काही झाले तरी आजच्या मतदानाच्या दिवशी पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत कलगीतुरा बारामतीच्या चव्हाट्यावर रंगला. त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा विक्रमी मताधिक्याचा विषय वाहून गेला.