जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...

जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...

 


देशाच्या आगामी जनगणनेसाठी प्रशासकीय स्तरावर तयारी वेगाने सुरू झाली असून, यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'डिजिटल नोंदणी'. नागरिकांना आता गणनेसाठी कर्मचाऱ्यांची वाट पाहण्याची गरज नाही; ते स्वतः आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदवू शकतात. यालाच 'स्व-गणना' असे म्हटले जाते.

स्व-गणना कशी करावी? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
नागरिकांसाठी ही प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर https://se.census.gov.in/ जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. 

OTP पडताळणी: मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला एक 'स्व-गणना' अर्ज दिसेल.

माहिती भरणे: यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव जे नंतर बदलता येत नाही, ते नोंदावावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या घराचे लोकेशन पिनकोडवरून सेट करावे लागेल. 

यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. यामध्ये तुमच्या घराची बांधकामानुसार परिस्थिती, घरात टीव्ही आहे का, मोबाईल स्मार्टफोन की साधा, इंटरनेट कशावरून वापरता, कॉम्प्युटर आहे का असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यापुढील एक पर्याय निवडायचा असतो. घराचा प्रकार (पक्के/कच्चे), पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची उपलब्धता, स्वयंपाकासाठी इंधनाचा प्रकार (गॅस/इतर). घरात उपलब्ध असलेली वाहने (सायकल/दुचाकी/चारचाकी), इंटरनेट सुविधा, टीव्ही, रेडिओ इत्यादींची माहिती यात भरावी लागते. 

जाती-पातीचे काय...
यंदाची जणगणना ही जाती-पातीची मोजणी असेल असे सांगितले जात होते. यामध्ये केवळ एसटी, एसटी आणि इतर असाच पर्याय देण्यात आला आहे. माहिती पूर्ण भरून सबमिट केल्यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक संदर्भ क्रमांक (Reference Number) येईल.

गणक आल्यावर काय करावे?
जेव्हा जनगणना कर्मचारी तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा संदर्भ क्रमांक दाखवायचा आहे. तुम्ही दिलेली माहिती त्यांच्याकडील डिव्हाईसमध्ये दिसेल.  

हे नोंदविले म्हणजे झाले...?
नाही, यामध्ये फक्त तुमच्या नावाची नोंद होते, तुमच्या घरच्यांच्या नावाची नाही. ते किती आहेत त्याचा आकडा द्यावा लागतो. घरची परिस्थिती आणि इतर प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतात. जनगणना कर्मचारी घरी आल्यावर दीर्घकाळ बसून माहिती देण्याची गरज उरणार नाही.  तसेच नागरिक स्वतः माहिती भरत असल्याने चुकांची शक्यता कमी असते.  जनगणना कर्मचारी आणखी काही माहिती घेऊ शकतात, ती अद्याप समोर आलेली नाही. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.