मुंबईतील ६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई; परवानेही रद्द करुन टाकले!

मुंबईतील ६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई; परवानेही रद्द करुन टाकले!

 

मुंबई: राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. आता अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील ६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटसह बेकरींवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करण्यात आली. मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह सहा रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि क्लबच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातही कारवाई

नरिमन पॉइंट येथे 'फ्लिंट अँड वार्सा' या रेस्टॉरंटची २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर बोरीवली इथल्या एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय, भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800222365 उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका; बनावट अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय? 

अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी करून हॉटेलवर धाड टाकल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली पश्चिमेकडे आहार हॉटेलवर बोगस बंटी आणि बबली एफडीए अधिकाऱ्यांनी टाकली. हॉटेल मालकाकडे अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी देखील देण्यात आली. 'Food Corporation of India'चे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला. हॉटेल मालकाला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. बनावट अधिकारी असल्याचा संशय असलेल्या बंटी बबली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिण्याचं पाणी मोफत द्या- तुकाराम मुंढे 

अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवलं जातं. तसं न करता ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. तसा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. जर एखाद्या ग्राहकाला बाटलीबंद पाणी हवं असेल, त्याने मागणी केली तरच त्याला ते देण्यात यावं, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

तुकाराम मुंढेंनी 25 मे रोजी स्वीकारला होता पदभार

गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार २५ मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.