आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात  १५ टक्के सूट

आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सूट

 

मुंबई  :- राज्य मार्ग परिव हन (एसटी) महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट मिळणार आहे.ही सवलत १ जुलैपासून लागू होणार असून,१५० कि.मी.पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.

    महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली होती.त्यानुसार आता ती लागू करण्यात येत आहे.ही योजना साधी लालपरी, ई-शिवाई आणि शिवनेरी,सेमी लक्झरी अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहे, तसेच ती पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आरक्षण करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.जादा बससाठी ही सवलत लागू असणार नाही.

🟪 किती प्रवासी करतात आगाऊ आरक्षण ?

     एसटी तून रोज सुमारे ५२ लाख लोक प्रवास करतात. त्यापैकी लांब पल्ल्याचा प्रवास करणारे साधारण २ ते ३ टक्के प्रवासी म्हणजे १.५ लाख प्रवासी आगाऊ आरक्षण करतात.

🔸गणेशोत्सवामध्ये एसटीच्या १,५०० नियमित गाड्या कोकणात जातात.

    या गाड्यांचे देखील आगाऊ आरक्षण होत असून त्या माध्यमातून सुमारे ६८ हजार  चाकरमानी प्रवास करतात.

🔸 मुंबई - पुणे मार्गावर ई शिवनेरीच्या माध्यमातून रोज सुमारे ३,२०० जण प्रवास करत असून यापैकी १०० पेक्षा जास्त प्रवासी ऑनलाईन तिकीट आरक्षित करतात.