बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

 


मुंबई:- येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून, कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील बैठकीत दिली. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

गणपती आणि कोकणचे अतूट नाते

गणपती उत्सव हा कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. “गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे नाते अतूट आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरवर्षी कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता विशेष सेवा पुरवते. यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ५,००० जादा बसेस कोकणातील रस्त्यांवर धावणार आहेत. गतवर्षी ४,३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, यंदा ही संख्या वाढवण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण प्रक्रिया सुलभ केली आहे. प्रवासी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा MSRTC Bus Reservation अॅपद्वारे तिकिटांचे आरक्षण करू शकतात. तसेच, बसस्थानकांवरही आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, २२ जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होत आहे. यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के तिकिट सवलत देण्यात येणार आहे. या सवलतींमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक किफायतशीर होणार आहे.

भाविकांचा प्रचंड प्रतिसाद

नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस सोडल्या होत्या. या सेवेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच यशस्वी अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, गणपती उत्सवासाठीही महामंडळाने ५,००० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर येथील प्रमुख बसस्थानकांमधून २३ ऑगस्टपासून सोडण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाने विशेष उपाययोजना केल्या

गणेशोत्सवादरम्यान प्रवास सुरळीत व्हावा यासाठी एसटी महामंडळाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. बसस्थानक आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

एसटी महामंडळाने नेहमीच प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य दिले आहे. गणपती उत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळ पूर्णपणे सज्ज आहे. प्रवाशांनी आरक्षणाचा लाभ घेऊन आपला प्रवास आधीच निश्चित करावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.