पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
सोमेश्वरनगर: मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ केंद्र सरकारकडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पूरग्रस्तांसाठी जे -जे करणे शक्य आहे ते आम्ही करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर येथे दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या डिस्टिलरी विस्तारवाढ प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) रोजी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सर्व संचालक यांच्यासह शेतकरी-सभासद उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यावर पुराचे आस्मानी संकट आहे. शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने 2200 कोटी रुपये मंजूर केले असून, शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जात आहे.
निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण सध्या सुरू आहे, मात्र पूर्ण कालव्याला अस्तरीकरण होणार नसून ज्या ठिकाणी भराव खचले आहेत, कालवा फुटण्याचा धोका आहे त्याच ठिकाणी अस्तरीकरण होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा असे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.
जि. प. निवडणुकीत नव्यांना संधी
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वरच्या सभेत केल्याने येणाऱ्या निवडणुकीत इच्छुक तरुणांची संख्या वाढणार आहे.
पूरग्रस्तांसाठी 15 लाखांची मदत
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आणि संचालक मंडळांनी पूरग्रस्तांसाठी 15 लाख रुपयांची भरीव मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली. पूरग्रस्तांसाठी सर्वांनी मदत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उद्योजक आर. एन. शिंदे यांनी दोन लाख, पंकज निलाखे यांनी 51 हजार आणि सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर यांनी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
सोमेश्वरकडेही येणार आहे
आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो..! आता तिथे सभासददेखील झालो आहे. पण, थोडे थांबा मी सोमेश्वर कारखान्याकडे पण येणार आहे असे म्हणताच उपस्थित शेकडो सभासदांच्या भुवया उंचावल्या..! मात्र थोड्याच वेळात मी गंमत केली असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभासदांच्या टाळ्या घेतल्या. मात्र, एकंदरीत उपमुख्यमंत्र्यांनी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन व्हावे का..? या प्रश्नावरती पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
केलेले काम योग्य
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टोले मारायला कमी करत नाहीत. शुक्रवारीही त्यांनी बारामती शहरातील पूर्वीचा तीन हत्ती चौक व आताचा तिरंगा चौक याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांना टोला मारला...अनेक जण खूप लांबून कुणाकुणाला घेऊन येत होते.. हे बरोबर आहे का..? ते बरोबर आहे का..? असे सांगत होते. पण, मी पुढील 25 ते 50 वर्षांचे नियोजन करूनच काम करतो. त्यामुळे काही दिवसानंतर टीकाकार टीका करतात.. पण नंतर अजित पवारांनी केलेले काम योग्य आहे असेच म्हणतात. सोमेश्वर कारखाना येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य.