
दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे : रामदास आठवलेंचे सूचक विधान
फडणवीस सर्व वर्गांना सोबत घेऊन जाणारे मुख्यमंत्री
देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण मिळत आहे; पण पण मराठा समाजातही आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वात पहिली मागणी मी केली होती. देशातील गरीब पाटीदार, पटेल, रेड्डी यांनाही आरक्षण मिळायला हवे. मात्र ओबीसी व एससी, एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणे आवश्यक आहे. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे लोकप्रिय नेते आहेत. मी त्यांना त्यांच्या गावी जाऊन भेटलो होतो. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या त्यांच्या मुद्द्याला माझा पाठिंबा असल्याचेही सांगितले होते.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व वर्गांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत. या वेळीही त्यांनी आपले हेच सर्वसमावेशक रूप दाखवले. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आले, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. फडणवीसांना कोणतेही पद घ्यायचे नव्हते, पण वरिष्ठांनी त्यांना पद घेण्याची विनंती केली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. १३२ जागा मिळवणाऱ्या भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवणे योग्य निर्णय होता. आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे चांगले काम करत आहेत, असेही आठवले यांनी नमूद केले.
... तर देशाचा पंतप्रधान एखादा दलित बनेल
देशातील दलित नेत्यांचे ऐक्य व्हावे, अशी माझी मन:पूर्वक इच्छा आहे. असे झाले तर सर्वांनी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये यायला हवे. या आघाडीचे नेतृत्व मायावतींना देण्यात मला खूप आनंद होईल. कधीकाळी इंडिया आघाडीप्रमाणे 'नॅशनल दलित फ्रंट'ची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये माझ्यासह रामविलास पासवान, उदित राजजी आदी सहभागी झालो होतो. राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आलो तर देशाचा पंतप्रधान एखादा दलित बनेल. दलित राजकारणाच्या एकतेसाठी मायावतीजी जर एक पाऊल पुढे आल्या, तर मी दहा पाऊले मागे जाण्यास तयार आहे. दलित राजकारणाच्या आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारले, तर देशात मोठा बदल होऊ शकतो, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
लोकशाहीत मतदानाची चोरी होऊ शकत नाही!
राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरी आरोपाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, लोकशाहीत मतदानाची चोरी होऊ शकत नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये. एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान करू नये. मतदार यादीतील त्रुटी आधीही समोर येत होत्या, ज्यात सुधारणा सुरू असते. भाजपला आरक्षण संपवायचे आहे आणि संविधान बदलायचे आहे, असा आरोप राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी केला. याचा फटका भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएला बसला. यापूर्वी काँग्रेसचे पंतप्रधान कधीच बाबासाहेबांचे नाव घेत नव्हते. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएने ४०० पारचा नारा दिला होता; पण प्रत्यक्ष निकालवेळीी आमची संख्या कमी झाली. त्यावेळी आम्ही असा आरोप केला नाही की, काँग्रेसने आमची मते चोरली. राहुल गांधींच्या आरोपांमुळे आमच्या जागा कमी झाल्या. लोकशाहीत ज्याला बहुमत मिळते त्याचे सरकार येते;पण महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची मतदानाची चोरी झाली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील
पाच वर्षांपूर्वी भाजपने ७४ जागा मिळाल्या असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले होते, कारण निवडणुकीपूर्वी हेच वचन दिले होते. यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, असे सांगितले आहे. आता तिथे राजकीय पक्ष आपली मते वाढवण्याची चर्चा होत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते वाढवण्याचा अधिकार आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी निरर्थक गोष्टी बोलताना
राहुल गांधींचा केंद्र सरकारला कोणताही धोका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांचे नावही घेत नाही; पण राहुल गांधी २४ तास नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करत असतात. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी खूप प्रयत्न केले. खूप शक्ती एकत्र आल्या आणि त्यांना वाटले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करु. पण त्यांना अपयश आले, असा टोलाही आठवले यांनी लगावला.
प्रादेशिक पक्ष संपतील हा दावा तथ्यहीन
लवकरच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपेल, असा दावा केला भाजप नेत्याने केला आहे. मात्र तो तथ्यहीन आहे. लोकसभेत माझ्या पक्षाचा एकही सदस्य नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सलग तिसऱ्यांदा मंत्री बनवले आहे. आज माझा पक्ष भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भाजप आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीच सन्मानजनक व्यवहार करते. भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या मदतीने मी माझ्या पक्षाला देशभरात वाढवले आहे, असेही रामदार आठवले यांनी सांगितले.