जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील - पंतप्रधान मोदी

जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील - पंतप्रधान मोदी

 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'वीर बाल दिवसा'निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात भाषण केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण त्या शूर साहिबजादांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत. ते भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि परिस्थितीच्या सीमा तोडणारे हे शूरवीर आहेत. ज्या राष्ट्राचा इतका गौरवशाली भूतकाळ आहे, ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा वारशाने मिळाली आहे, ती जेन-झी पिढी भारताला विकसित राष्ट्र करू शकेल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांचा जेन-झी ला खास संदेश

"माझ्या देशाची तरुण पिढी आज या कार्यक्रमात आहे. एका अर्थाने, तुम्ही सर्व 'जेन-झी' आहात. काही 'जेन-अल्फा' देखील आहात. तुमची पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. माझा या पिढीवर खूप विश्वास आहे. मला प्रामाणिकपणे वाटते की, केवळ वयाने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. प्रत्येकाचे कर्तृत्व त्याला लहान-मोठा बनवत असते. तुम्ही तुमच्या कामातून आणि कामगिरीतून महान बनता. अगदी लहान वयातही तुम्ही अशी कामे करू शकता की इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही भारताचे भविष्य आहात," असा मोलाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवांना दिला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, २६ डिसेंबरचा हा दिवस जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा मला समाधान वाटते की आपल्या सरकारने युवा पिढीच्या शौर्याने प्रेरित होऊन वीर बाल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत, वीर बाल दिवसाच्या नवीन परंपरेने प्रेरणा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली आहे. वीर बाल दिवसाने धाडसी आणि प्रतिभावान तरुणांच्या विकासासाठी एक व्यासपीठ देखील तयार केले आहे. दरवर्षी, विविध क्षेत्रात देशासाठी काहीतरी साध्य करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावेळी देखील देशाच्या विविध भागातील २० मुलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.