अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? फडणवीसांनी दिलं उत्तर

अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? फडणवीसांनी दिलं उत्तर

 

राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी युती आणि आघाडी केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आघाडी केली आहे. ही आघाडी भविष्यात भाजपासोबत सत्तेत येण्यास तयार असेल तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार, असा प्रश्न लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी लोकमतच्या विशेष मुलाखतीत विचारला. यावर देवेंद्र फडणवीसांनी अतिशय रोखठोक उत्तर दिले.

"सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांची आघाडी ही स्थानिक पातळीवर आहे असे आम्ही समजतो. ही आघाडी आमच्या माहितीनुसार दोन शहरांपुरती आहे. कारण इतर शहरांमध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. भविष्यात काय होईल याबद्दल मी बोलणे सोडून दिले आहे. महाराष्ट्रात जे-जे घडलं, ते माझ्यासाठी अनाकलनीय होते. एक काळ असा होता, जेव्हा मी ठामपणे म्हणायचो की हे होणार नाही आणि तेच झालेलं मी राजकारणात बघितले आहे. पण सध्यातरी मला तशी परिस्थिती दिसत नाही," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले आणि आमची महायुती अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही अजित पवारांना सोबत घेतले. आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली. अजित पवार यांनी आपली भूमिका खूप मोठ्या प्रमाणावर बदलली आहे आहे. त्यांची जुनी वक्तव्ये आणि आताची वक्तव्य पाहता त्यांचा दृष्टिकोन बदललेला पूर्णपणे दिसतो. शिवसेना पहिल्यापासूनच आमचा नैसर्गिक मित्र आहे. पण जर आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घ्यावी लागते," असे फडणवीस म्हणाले.

"पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे भाजप एक नंबरला आहे, तर राष्ट्रवादी दोन नंबरला आहे. त्यांना असे वाटले की एकट्याच्या जीवावर आमच्या विरोधात निवडणूक लढणे कठीण आहे, त्यामुळे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या. या महानगरपालिकांमध्ये आमचे सरकार आल्यानंतर विकासाची वाढलेली गती लोकांना दिसतेय. त्याआधी शरद पवारांकडे या महानगरपालिका होत्या आणि त्यांचे प्रमुख शिलेदार हे अजित पवार होते. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की त्या काळात काय काय विकास, सुविधा झाल्या. या प्रश्नांपासून लोकांना दूर नेण्यासाठी त्यांनी वेगळे विषय काढले आहेत. विकासाबाबत बोलायचेच नाही असा त्यांचा आवेश दिसतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वाद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

"आपल्या सहयोगी पक्षावर टीका करताना काय बोलायचे याचा विचार अजित पवारांनी केला पाहिजे. माझा स्वभाव कसा आहे हे सर्वांना माहिती आहे. मी जर बोलायचं ठरवलं, तर मी काय बोलू शकतो, किती बोलू शकतो, कशी उत्तर देऊ शकतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण मी माझी भूमिका ठरवलेली आहे. इतरांना जसे वागायचं आहे, ते त्यांना ठरवू दे. टीकेला उत्तर न देणे ही दबकी भूमिका मुळीच नाही. उलट आम्हाला वादात पडायचे नाही. त्यांना विकासाच्या मुद्द्यापासून निवडणूक दूर घेऊन जायची आहे. म्हणून ते वाद निर्माण करतात. सकाळी वाद सुरू करायचा आणि त्यावर दिवसभर चर्चा घडवायची अशी त्यांची रणनीती असते. त्यामुळे विकासावर कुणीच बोलत नाही. पण आम्ही तसे करणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले.