‘अरबी समुद्रातील शिवस्मारक होईल, असं वाटत नाही’, संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली तीव्र नाराजी
शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६
Edit
नवी दिल्ली : ‘‘आता अरबी समुद्रातील शिवस्मारक होईल, असे मला वाटत नाही. हे शिवस्मारक व्हावे यासाठी मोठे आंदोलन केले. मात्र परवानग्यांचे दाखले देत पुढे काहीच होत नाही,’’ असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यातील किल्ले संवर्धनासाठी ज्या प्रमाणात मदत अपेक्षित आहे त्या प्रमाणात सरकारची मदत होत नाही असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीत होते. यादरम्यान बोलताना ते म्हणाले की, ‘‘राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. तरीही परवानग्या मिळत नाही ही सबब दिली जाते. त्यामुळे सरकारने याबाबत स्पष्टता द्यावी. एक तर शिवस्मारक करावे किंवा काय करणार आहेत, याबद्दल राज्याला सांगावे,’’ असेही ते म्हणाले.
राज्यातील गडकिल्ले संवर्धनाबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ‘‘रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गराज रायगडाचे संवर्धन आणि विकास कामे सुरू आहेत. या कामांमध्ये सरकारची मदत होत आहे मात्र ज्या प्रमाणात मदत अपेक्षित आहे तशी होत नाही. १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले मात्र त्यापैकी केवळ रायगड किल्ल्यावर काम सुरू आहे. इतरही किल्ल्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.’
‘‘आपल्याकडे काही किल्ले समुद्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' असे संबोधले जाते. सर्व किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे. राज्यात सी फोर्ट सर्किट टुरिझम होणे आवश्यक आहे. याद्वारे ज्या किल्ल्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला वाचवले ते अप्रतिम किल्ले देश विदेशातील लोक बघू शकतील, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.