अवधुतनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीच्या झाडांची तोड; पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
बारामती: शहरातील अवधुतनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीच्या झाडांची तोड सुरू असल्याचे समोर आले असून या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॅनॉलच्या कडेला तसेच परिसरातील काही भागांमध्ये अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडे अचानकपणे कापली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या झाडांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवधुतनगर परिसरातील कॅनॉललगत असलेल्या निलगिरीच्या झाडांची काही दिवसांपासून सातत्याने तोड केली जात आहे. या झाडांमुळे परिसराला मोठ्या प्रमाणावर सावली मिळत होती. तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठीही या झाडांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता अचानकपणे झाडे कापली जात असल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
झाडांची तोड करताना संबंधित प्रशासनाची किंवा वन विभागाची आवश्यक परवानगी घेतली आहे का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. परवानगी न घेता ही झाडे तोडली गेली असल्यास हा प्रकार गंभीर मानला जात असून यामध्ये आर्थिक व्यवहार किंवा अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत का, याची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.
बारामती शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहिमा राबवल्या होत्या. त्यांच्या पुढाकारामुळे शहरात विविध ठिकाणी हजारो झाडांची लागवड करण्यात आली होती आणि बारामतीला हरित शहर म्हणून ओळख मिळाली होती. मात्र त्याच शहरात आता मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.