“माळेगाव साखर कारखाना कसा चांगला चालेल याकडे लक्ष, दादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार

“माळेगाव साखर कारखाना कसा चांगला चालेल याकडे लक्ष, दादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार

 

बारामती: राज्याचे लोकप्रिय नेते दिवगंत अजित पवार यांचे स्वप्न होते की, माळेगाव सहकारी साखर कारखाना देशात क्रमांक एक बनावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, प्रामाणिकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. आपण सर्व मिळून अजितदादांचे स्वप्न नक्की पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. 

अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही स्वीकारले. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणूनही एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राजकारणात सक्रीय सहभागी झालेल्या सुनेत्रा पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याला भेट दिली. 

कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझे लक्ष असेल

गेली काही वर्ष अजितदादांची सकाळ कारखान्याचे एमडी यांना फोन करण्यापासून व्हायची. अनेक कारखान्यांना मी देखील अधून-मधून भेट देत होते. कारखान्याबाबत सखोल माहिती नसली तरी माझी तोंड ओळख आहे. त्यामुळे काम करताना जरी अडचणी आल्या तरी सहकाऱ्यांमुळे अशक्य होणार नाही. कारखाना कसा चांगला चालेल याकडे माझे लक्ष असेल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अशा पद्धतीने मला इथे यावे लागेल असे स्वप्नातही वाटले नाही. माळेगाव कारखाना देशामध्ये अग्रगण्य कारखाना व्हावा, असे दादांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती. अजितदादांना हा कारखाना त्यांना देशामध्ये एक नंबरचा बनवायचा होता, त्यामागे ते खूप काम करत होते. चेअरमन झाल्यावर अल्पावधीतच खूप काही गोष्टी त्यांनी कारखान्यासाठी केल्या. दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आपण सगळेच शेतकरी या सगळ्यांच्या भल्यासाठी दादांनी जे ठरवले आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करेन, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.