“अजितदादांची परंपरा पुढे नेण्यास वचनबद्ध”; सुनेत्रा पवारांच्या ‘जनता दरबार’ला मोठा प्रतिसाद
बारामती: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, 'सहयोग' या निवासस्थानी 'जनता दरबार' आयोजित केला होता. या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या. याबाबत सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली.
बारामतीत सर्वसामान्य नागरिकांशी भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या व अडचणी मनापासून ऐकून घेतल्या. त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्य करण्याची परंपरा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपली होती; त्याच परंपरेला पुढे नेण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
विविध गावांतील लोक प्रश्न मांडण्यासाठी आले
सहयोग सोसायटीतील निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती तालुक्यातील विविध गावांतील लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अडचणी, स्थानिक नागरी समस्या आणि इतर वैयक्तिक तक्रारी महिलांनी मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे संयमाने ऐकून घेत, सुनेत्रा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांसोबत बैठक पार पडली. यावेळी कारखान्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे अडचणी आणि संचालकांच्या सूचना जाणून घेत पुढील कामकाजाबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले. या बैठकीत उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेल्या प्रगतीच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.