“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आताच्या घडीला ज्या प्रकारची जागतिक पातळीवर परिस्थिती तयार झाली आहे, त्याचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानात तर पेट्रोलचे भाव साडेचारशे रुपये इतके वर गेले आहेत. पेट्रोल डिझेल याची अनेक देशात कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅस या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, या गोष्टींचा अमर्याद वापर आपल्याला करता येणार नाही. पुरवठा साखळीची परिस्थिती पाहता आणि परकीय चलन आपल्याला कसे वाचवता येईल, याकरिता पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन योग्य आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितले त्याचा जर अर्थ राहुल गांधी यांना कळला नाही, तर याचा दोष त्यांना देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो अर्थ जनतेला कळला, जनता प्रतिसाद देईल. देशामध्ये सर्वांत रिजेक्टेड नेता, रिजेक्टेड माल म्हणून अख्ख्या देशाने त्यांना नाकारले आहे. त्यांना तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसची अवस्था अशी आहे की, केंद्रीय नेतृत्वाला कोणी मानत नाही. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेऊ शकत नाही. केंद्रीय नेतृत्व राज्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. कर्नाटकात आपण पाहिले, तेच आता केरळमध्ये होणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
राहुल गांधी नेमके काय म्हणाले होते?
मोदींनी जनतेकडून त्यागाची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा. हे उपदेश नाहीत, हे अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत त्यांनी देशाला अशा टप्प्यावर आणले आहे की, जनतेला काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये, हे त्यांनाच सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी, जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात. एका Compromised PM च्या हातात आता देश चालवण्याची सूत्रे राहिलेली नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत केली होती.
दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले. 'वर्क फ्रॉम होम', ऑनलाइन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा. पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोना काळात आपण ऑनलाइन बैठका आणि 'वर्क फ्रॉम होम'ची सवय लावून घेतली होती. आता देशहितासाठी ती पद्धत पुन्हा अमलात आणण्याची वेळ आली आहे. यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही, तर देशाचे कोट्यवधींचे परकीय चलनही वाचेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.