‘बहूजन हिताय बहूजन सुखाय’ प्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी काम करा - खासदार सुधा मूर्ती
सोमवार, ६ जुलै, २०२६
Edit
बारामती: प्रत्येकाच्या जीवनात विविध अध्याय असतात, परिस्थितीप्रमाणे जीवन बदलत जाते, त्यामुळे जीवनात कुठल्याही परिस्थितीत हार मानू नका; अनुकुल वा प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता अंगी विकसित करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. यापुढे जनसेवा आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी येथे ‘सीडस् ऑफ इन्सपायरेशन’ विषयावर
आयोजित व्याख्यान्यात त्यांनी मार्गदर्शन केले. खासदार तथा ज्येष्ठ
समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गजानन पाटील, नगराध्यक्ष सचिन सातव, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त
राजीव शहा, ॲड. निलीमा गुजर, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, शिक्षक,
पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
श्रीमती पवार
म्हणाल्या, सुधा मूर्तींनी संपूर्ण जीवन लोककल्याकरिता अर्पण केले आहे.
त्यांचे देशभरात समाजसेवेचे कार्य सुरु आहे. त्यांच्या जीवन कार्यातून
प्ररेणा, उर्जा मिळते. आयुष्यात सतत नवनवीन शिकत राहण्यासह त्याचा
समाजाकरिता उपयोग केला पाहिजे.
आज त्यांचे बारामतीकरांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांचे
मार्गदर्शन हीच आपल्याकरिता स्फूर्ती आहे. आजचा दिवस येथील नागरिकांकरिता
आनंदाचा आणि सुर्वणाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. बारामतीच्या विकास
त्यांनी स्वत: अनुभवला असून त्या बारामती येथील विद्यार्थी, नागरिकांच्या
प्रेमात पडल्या असून आगामी काळात बारामतीत परत येणार आहेत, असेही श्रीमती
पवार म्हणाल्या.
श्रीमती मूर्ती म्हणाल्या,
विद्यार्थीजीवनात चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे. चांगल्या सवयी
जीवनभर उपयोगी पडतात त्यामुळे जीवनात यशस्वी होण्याकरिता स्वत:सह परिसर
स्वच्छता, नीटनेटकेपणा, संयम आदी गुणांचे पालन करण्यासह वेळेच नियोजन,
शिस्तीचे पालन, कठोर परिश्रम, निर्णय घेण्याची क्षमता अंगी विकसित करण्यावर
भर दिला पाहिजे. उपयोजनात्मक विज्ञान समाजात बदल घडवून आणते. ‘बहुजन हिताय
बहुजन सुखाय’ या उक्तीप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे.
त्यापुढे
म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आण्यामागे शिक्षकांचा
मोठा वाटा असतो, पालकांसह शिक्षकांनीही मुलांवर चांगले संस्कार केले
पाहिजे. मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांच्या स्वप्नपूर्तीकरिता प्रयत्न करु
द्या, तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. फुलाच्या कळीप्रमाणे
नैसर्गिकरित्या त्यांचे जीवन फुलू द्या, अशा सल्ला श्रीमती मूर्ती यांनी
दिला.
विद्यार्थ्यांनो, जीवन सोपं किंवा कठीण
नाही, जीवनात यश अपशय येत असते , अपयशामुळे खचून जाऊ नका. संकटाच्या काळात
धैर्याने वाटचाल करुन विविधांगी जीवनाचा आनंद घ्या. स्वत: कुटुंब,
मातृभाषा, शाळा, महाविद्यालय, राज्य, देशावर प्रेम करा तसेच आई-वडील,
शिक्षक, वयोवृद्ध नागरिकांचा आदर करा, असा सल्ला श्रीमती मुर्ती यांनी
दिला.
विद्येच्या जोरावर आजच्या युगात महिला
विविधांगी भुमिका सांभाळण्यासोबतच विविध क्षेत्रात पुरुषांच्या खाद्यांला
खादा लावून काम करीत आहे. बदल्या काळानुसार कृत्रिम बुद्धीमत्ता,
रोबोटिक्सचे शिक्षण उपयुक्त असून ते स्वीकारले पाहिजे. शेतकरी हा देशाचा
कणा आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रातही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे,
असेही श्रीमती मुर्ती म्हणाल्या.
यावेळी
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्रीमती पवार आणि श्रीमती मूर्ती
यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरुन प्रतिसाद
दिला.