बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे प. महाराष्ट्राच्या विकासाला गती; महाराष्ट्रातील दोन आणि देशातील ७५ अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे प. महाराष्ट्राच्या विकासाला गती; महाराष्ट्रातील दोन आणि देशातील ७५ अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

 

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यापैकी बारामती रेल्वेस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बारामती : यावेळी पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा आधुनिकीकरणाकडे वेगाने प्रवास सुरू असून जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारतसारखे उपक्रम हे या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण असल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, विकासाची जाणीव आणि सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'विकसित रेल्वे स्थानकाचा भारत' आणि 'विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन' या विषयांवर झालेल्या स्पर्धांमध्ये एम. ई. एस. गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय, निर्मला हरिभाऊ प्राथमिक शाळा तसेच इतर शाळांतील एकूण २ हजार ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, आधुनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक रेल्वे स्थानकाची संकल्पना मांडत विकसित भारतासाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी पाळण्याच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले.

सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून त्यासाठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा फलद्रूप झाल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. स्थानकाच्या इमारतीमध्ये आधुनिक सुविधांसह स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब दिसेल अशी वास्तुरचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' अंतर्गत विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेला चालना मिळणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव


पुणे विभागीय रेल्वे मंडळाकडून बारामती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यातील रेल्वे प्रकल्पांना मोठी गती

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठी गती मिळाली असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास त्याचाच एक महत्त्वाचा भाग असल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी नमूद केले. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरेल. औद्योगिक क्षेत्राला वाहतूक सुविधा, कृषी उत्पादनांना बाजारपेठ, तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.