प्राण द्यायचे नाहीत; फक्त इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात

प्राण द्यायचे नाहीत; फक्त इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात

 

मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या आणि त्यांना तिथे मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

 सोमवारी (ता 17) देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचं सांगत दिल्लीच्या राजकारणात जाण्याबाबतच्या चर्चांवरती त्यांनी पूर्णविराम दिला, त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संपन्न राज्य असून या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी असू शकत नाही.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व असून, त्यांची सर्वाधिक गरज महाराष्ट्रालाच आहे, दिल्लीला नाही, अशी भावना व्यक्त केली, त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला पाठविण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्या म्हणाल्या. तर याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, इकडच्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, खूप मोठा बंगला मिळेल, त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे.

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत आपली भूमिका व्यक्त केलेली आहे की, मी महाराष्ट्रातच राहणार कोणी किती पतंग उडवा, काही करा, चर्चा करा, पण मी मुंबईतच राहणार असं म्हटलं, आता मिसेस फडणवीसही म्हणत आहेत की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना का तुम्ही दिल्लीला पाठवता? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत, या महान सेवकांने असं सांगितलं होतं की, जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं या महान सेवकाचे वक्तव्य मला या क्षणी आठवतंय. त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो, पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचा आहे ना, आरएसएससाठी, संघासाठी, भाजपसाठी. राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साद आहे, तर भलेभले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत ना, महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काय सांगायचे, आधी देश मग राज्य ही आमची भूमिका आहे. देशाने जर मला साद घातली तर देशासाठी प्राण देईन, इथं काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, मोठ्या बंगल्यामध्ये, खूप मोठा बंगला मिळेल, त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे असंही पुढे राऊत म्हणालेत.

तर संजय राऊतांच्या वक्तव्यावरती अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमची मानसिकता, देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे आणि तीच राहणार. आमची जी मानसिकता आहे ती महाराष्ट्रासाठी योग्य आहे.