माळेगावने  राज्यातील २०० कारखान्यांपेक्षा उच्चांकी ॲडव्हान्स दिला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

माळेगावने राज्यातील २०० कारखान्यांपेक्षा उच्चांकी ॲडव्हान्स दिला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

 

बारामती:- दि माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. सहकाराला दिशा देणाऱ्या या कारखान्याने राज्यातील २०० खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला उच्चांकी अॅडव्हान्स दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने निरावागज येथील प्रचार समेत पवार बोलत होते.

       पवार पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक साखर कारखाने असे आहेत, जे २५०० रुपये प्रतिटन ऊसदर देतात. मात्र, माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊसदर दिला आहे. असे असताना विरोधक माझ्यावर सहकार मोडीत काढण्याचा आरोप करीत आहेत. मी सहकाराला बळकटी, ताकद आणि मजबुती देणारा आहे. त्यामुळे माझ्या आधिपत्या खालील माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाने हे सहकारातील उच्चांकी ऊसदर देणारे 'कारखाने म्हणून ओळखले जातात.

        दरम्यान,पाच वर्षांपूर्वी विरोधकांकडून कारखाना आपल्या ताब्यात आला, त्या वेळी विरोधकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारखाना चालविल्यामुळे शेवटच्या वर्षी साखर उतारा केवळ १०.६१ असा होता. तोच कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर विक्रमी गाळप करून पावणेबारा बारा टक्के साखर उतारा मिळविला. त्यामुळे शेतकरी सभासदांना सातत्याने अधिकचे पैसे देता आले. मी जर सहकार मोडीत काढायला निघालो असतो, तर तालुक्यातील सहकारी संस्था यामध्ये दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कामकाज पाहा. शासनाच्या माध्यमातून या सर्व संस्थांना मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. काही संस्थांच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभे केले आहेत. दूध संघाच्या माध्यमातून उपपदार्थांची निर्मिती करीत या संस्था अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

      मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या शब्दाला किंमत आहे.माळेगाव कारखान्याला २५० कोटी रुपयांचे आयटीचे पत्र आले होते,त्यातून कसा मार्ग काढला हे संचालक मंडळाला विचारा,असे म्हणत पवार यांनी बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा केला.यामध्ये रस्ते,पूल,रेल्वेमार्ग,पालखीमार्ग, एसटी स्टैंड,विमानतळ आदीं बाबत सखोल विवेचन देत बारामती तालुक्याचा नावलौकिक वाढविण्याचे काम केल्याचा अभिमान असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. माळेगाव साखर कारखान्याची संलग्न असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळा च्या शैक्षणिक संकुलातील अंतर्गत रस्ते जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून तयार केले.याबाबत संस्थेला एक रुपयाची तोशीस लागू दिली नाही,असे पवार यांनी सांगितले. आपण एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेळेची,पाण्याची आणि पैशाची बचत करीत ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.त्यामुळे माळेगावच्या या निवडणुकीत श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमताने विजयी करा,असे आवाहन अजित पवार यांनी केले.

उच्चांकी दरासाठी तिन्ही कारखान्यात स्पर्धा

आपल्या ताब्यात श्रीसोमेश्वर साखर कारखाना, श्री छत्रपती साखर कारखाना आहे. तुम्ही जर माळेगाव साखर कार खाना ताब्यात दिलात, तर या तिन्ही कारखान्यांमध्ये कोण जास्तीची काटकसर करीत उच्चांकी ऊस दर देईल ? याची स्पर्धा लावणार - अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

 अण्णा... काका... झाले आतां दादा

   प्रत्येकाचा काळ असतो. एक काळ चंद्रराव अण्णांचा होता, तसाच रंजनकाकांचा होता; आता मात्र दादांचा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो, माळेगाव कारखान्याची कामगार वसाहत, अंतर्गत रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर देऊन कारखान्याच्या परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.हे करताना ऊस दरावर परिणाम होऊ देणार नाही,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.