दहावी-बारावी पुरवणी निकाल जाहीर; अशा पद्धतीने पाहा तुमचा रिझल्ट स्टेप-बाय-स्टेप!

दहावी-बारावी पुरवणी निकाल जाहीर; अशा पद्धतीने पाहा तुमचा रिझल्ट स्टेप-बाय-स्टेप!

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेतलेली दहावीची पुरवणी परीक्षा ३७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील १३ हजार ७०९ विद्यार्थी (३६.४८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर, राज्यातील ७३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी बारावीची पुरवणी परीक्षा दिली आहे. त्यातील ३१ हजार ६७६ विद्यार्थी (४३.६५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै आणि बारावीची २४ जून ते १६ जुलै दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ३८ हजार ७०२, तर बारावीच्या परीक्षेसाठी ७४ हजार १३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दहावीच्या पुरवणी परीक्षेत २०२३ मध्ये २९.८६ टक्के, २०२४ मध्ये ३६.७८ टक्के आणि २०२५ मध्ये ३६.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळातून सात हजार ६७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर, सात हजार ४२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील एक हजार ९०९ विद्यार्थी (२५.७१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्या तीन वर्षातील बारावीच्या पुरवणी परीक्षेची आकडेवारी पाहता, यंदाचा निकाल वाढल्याचे दिसून येते. २०२३मध्ये  ३२.१३ टक्के, २०२४ मध्ये ३२.४६ टक्के, तर २०२५ मध्ये ४३.६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागीय मंडळातून १६ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ७०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील पाच हजार ९४९ विद्यार्थी (३७.८७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.