
‘एसटी’चे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध: अजित पवार
हडपसर: एसटी महामंडळ आणि कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. तसेच सरकार एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्या अमृतमहोत्सव गौरव सोहळ्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, कोरोना कालावधीत एसटी कर्मचार्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा राज्य सरकारने पुढाकार घेऊन वेतनासाठी आवश्यक तरतूद केली होती. एसटीची सेवा लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. प्रवाशांनाही परवडणार्या दरात सेवा देणे आवश्यक आहे.
उदय सामंत म्हणाले, ‘राज्यातील शहरांचा विस्तार झाल्यामुळे एसटीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा आता मध्यवर्ती भागात आल्या आहेत. त्या ठिकाणी एसटी स्थानकांचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) विकास करण्यासाठी कराराचा कालावधी वाढविण्यासाठी सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे.’ डॉ. आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले.