कामावर मत मागा,पैशावर नव्हे; निधीसंबंधी वक्तव्यांवर शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना चिमटा
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
Edit
बारामती : सध्याच्या प्रचारात कामाच्या जोरावर नव्हे, तर
‘पैसे घे, निधी घे’ अशी भाषा दिसत आहे, ती लोकशाहीसाठी चांगली नाही,
अर्थकारणातून निवडणुका जिंकणार असाल, तर त्यावर टिप्पणी न केलेलीच बरी,’
अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला.
बारामती येथील गोविंदबाग या निवास्थानी शरद पवार
यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'पूर्वी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी स्थानिक
निवडणुकांमध्ये जास्त राजकारण न आणण्याची भूमिका घेतली होती. मात्र, या
वेळी गट, उपगट आणि अनोख्या युती तयार झाल्या आहेत. यावरून परस्परांमध्ये
एकवाक्यता नसल्याचे दिसते. माझ्यासारखे जे लोक आहेत, ते या निवडणुकांत
पूर्वीसारखे पडत नाहीत. आता दोन-चार दिवस राहिले आहेत, निकाल लोक देतील,'
असे पवार म्हणाले.
आरक्षणाबाबत न्यायालयाची ठाम भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण
मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत
असताना यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'सर्वोच्च न्यायालयाची
भूमिका या प्रकरणात खूप ठाम दिसते. दोन दिवसांत अंतिम निर्णय काय येईल, हे
सांगता येत नाही,' असे शरद पवार म्हणाले.
कर्जवसुलीस स्थगिती अपुरी
पूर, अतिवृष्टीमुळे काही
भागांत जमीनच वाहून गेली, तर काहींची साधने नष्ट झाली आहेत. राज्य सरकारने
शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे, त्याबाबत शरद पवार
यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ कर्जवसुली स्थगिती
नव्हे, तर सरकारने थेट आर्थिक मदत द्यायला हवी होती,’ असे सांगून राज्य
सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला दिलेल्या स्थगितीबाबत शरद पवारांनी
नाराजी व्यक्त केली.