"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एक देखणा, दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. धर्मेंद्र यांचं निधन झाल्यावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात, ''धर्मेंद्र जी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक अलौकिक अभिनेते आणि त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत ते खोल शिरायचे. विविध प्रकारच्या भूमिका ते ज्या सहजतेने आणि खास पद्धतीने साकारायचे, त्यामुळे त्यांनी कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा, नम्रता आणि प्रेमळ स्वभावासाठीही तेवढेच लोकप्रिय होते.. या दुःखद क्षणी, माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत आहेत.''
शरद पवार लिहितात की, ''१९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती.''
''२००४ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवत ते राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले. गेल्या काही वर्षापासून आपल्या लोणावळा येथील फॉर्म हाऊसवर कृषी विषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. आपल्या खास शैलीत सोशल मीडियावर त्याचे टाकलेले व्हिडीओ कायम चर्चेचा विषय ठरायचे. कधी या व्हिडीओ मधून तर कधी शेरो शायरी मधून त्यांची ख्याली खुशाली चाहत्यांना समजत होती. निरोगी, उत्साही आणि आनंदी राहणे आणि तोच आनंद सगळ्यांना वाटणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत होती. आपल्या कामातून सदैव आनंद देणारा हा जट, यमला.. पगला.. दिवाना.. जाता जाता प्रत्येक रसिक मनाला दुःखी करून अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. माझ्या आणि माझ्या तमाम शिवसेना परिवाराकडून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!''
अजित पवार यांनी पोस्ट करुन लिहिलंय की, ''हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे.''
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लिहितात, ''आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सहा दशकांहून अधिक काळ प्रत्येक देशवासीयाच्या हृदयाला स्पर्श करणारे धर्मेंद्र जी यांचे निधन, भारतीय चित्रपटसृष्टीचे न भरून येणारे नुकसान आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.''
''धर्मेंद्र जी हे त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी ज्या भूमिकेला स्पर्श केला, ती सजीव झाली आणि याच कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वयोगटातील कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयातून ते सदैव आपल्यामध्ये जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ॐ शांती शांती शांती.''