तुम्ही उमेदवारांकडे पाहू नका, थेट माझ्याकडे पहा; ४१ उमेदवारांकडून कसं काम करून घ्यायचं, ही जबाबदारी माझी - उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही उमेदवारांकडे पाहू नका, थेट माझ्याकडे पहा; ४१ उमेदवारांकडून कसं काम करून घ्यायचं, ही जबाबदारी माझी - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

बारामती : तुम्ही उमेदवारांकडे पाहू नका, थेट माझ्याकडे पाहा. ४१ उमेदवारांकडून कसं काम करून घ्यायचं, ही जबाबदारी माझी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, नगरपालिकेसाठी दिलेल्या ४१ उमेदवारांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ३३ उमेदवारांकडून प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करून घेण्याची ताकद माझ्यात आहे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज मी सत्तेत आहे आणि ही सत्ता जनतेच्या प्रश्नांसाठीच वापरली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

उर्वरित ३३ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन

तुम्ही उरलेल्या 33 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. तुमची साथ मला हवी आहे. तुमची साथ मिळाली की मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगत अजित पवार यांनी पुढचा बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा उपस्थितांसमोर मांडला.
मी बारामतीचा विकास कसा करणार आहे, हे सांगण्यासाठी इथे उभा आहे. असे स्पष्ट केले.

विकासासाठी निधी महत्त्वाचा..

नगरपालिकेच्या विकासासाठी निधी किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करताना अजित पवार म्हणाले,
नगरपालिकेचं वार्षिक बजेट साधारणतः 40 ते 45 कोटी रुपयांचं असतं. मात्र, राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी आणल्याशिवाय मोठी आणि दीर्घकालीन विकासकामे शक्य होत नाहीत. सत्तेत असलो तरच शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या टीकेला ठाम प्रत्युत्तर

विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने टीका, आरोप आणि बदनामीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत. परंतु विकास हा माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे,

बारामती सायन्स पार्कमुळे रोजगाराच्या संधी

बारामती सायन्स पार्कच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले की,सुमारे 29 कोटी 29 लाख रुपयांचा बारामती सायन्स पार्क प्रकल्प पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचा फायदा केवळ बारामतीपुरता मर्यादित राहणार नाही. आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थी, युवक आणि स्थानिक व्यावसायिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, तुम्ही फक्त घड्याळाकडे लक्ष द्या, तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.