जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत महायुतीचा झंझावात; भाजपचे ग्रामीण महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व
राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपा - शिवसेना युतीने सर्व बारा ठिकाणी महाविकास आघाडीला मात देत दणदणीत विजय मिळविला आहे. १२ पैकी ७ जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सरशी झाली आहे. सोलापूर, सिंधुदुर्गमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि सांगलीत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर येण्याची संधी आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी कोल्हापूर आणि साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याने तेथे त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होऊ शकतो. मात्र तिथे भाजपला बाजूला ठेवून शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. त्याचवेळी रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २० जागा मिळाल्याने तेथे भाजपा ज्याला मदत करेल त्याचा अध्यक्ष बसणार आहे.
राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येर्ण़ाया १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. ग्रामीण भागातील मिनी विधानसभा निवडणूक म्हणून या लढतींकडे पाहिले जात होते. या निवडणुकीत तब्बल ६२.२८ टक्के मतदान झाल्याने या लढती अटीतटीच्या होतील, असे तर्क लावला जात होता. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण मतदारांनी भाजप आणि महायुतीला स्पष्ट कौल दिल्याचे सोमवारच्या मतमोजणीतून समोर आले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंतच्या निकालानुसार सातारा, सांगली, सोलापूर, सिंधूदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशीव या सात जिल्हा परिषदेत भाजपची सरशी झाली आहे. तर, रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. तर, पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने चमकदार कामगिरी केली. तर, कोल्हापूर आणि लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने चांगली लढत दिली. मात्र, याही दोन्ही जिल्हा परिषदा महायुती ही एकत्रितपणे सत्तेच्या जवळ पोहचली आहे. बारा पैकी एकाही जिल्हा परिषदेत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला सत्तेच्या जवळ पोहचू शकली नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या या निवडणुकीत भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. एकेकाळी शहरी तोंडवळ्याचा पक्ष म्हणून शिक्का बसलेल्या भाजपने आता ग्रामीण भागातही आपली पक्कड घट्ट केली आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले. शिवसेना शिंदे गटाला दोन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जिल्हा परिषदेत यश मिळाले आहे. काँग्रेसने कोल्हापूर आणि लातूरमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांना सत्तेसमीप जाण्याइतके संख्याबळ मिळाले नाही.
महाराष्ट्रातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपने जोरदार मुसंडी मारत १२५ पैकी ५० ठिकाणी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले भेदण्यात भाजपला यश आले आहे. ग्रामीण राजकारणातील सत्तासमीकरणे बदलत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला २६, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ पंचायत समित्यांच्या चाव्या मिळाल्या. तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही प्रत्येकी ७-८ ठिकाणी तर ठाकरे गट ५ अशी पंचायत समित्यांची स्थिती आहे. १२५ पैकी शंभरहून अधिक पंचायत समित्यांमध्ये महायुतीने आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे.