'दादांचा जीव तुमच्या चुकांमुळे गेला, कार्यकर्ते आवरले जाणार नाहीत'; अमोल मिटकरींचा डीजीसीए  वर संताप, दिला इशारा

'दादांचा जीव तुमच्या चुकांमुळे गेला, कार्यकर्ते आवरले जाणार नाहीत'; अमोल मिटकरींचा डीजीसीए वर संताप, दिला इशारा

 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून आता सत्तेतील आणि विरोधातील दोन्ही बाजूंनी संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भाषेत केंद्र सरकारच्या डीजीसीए  यंत्रणेवर निशाणा साधला आहे. "दादा गेल्यानंतर आता तुम्हाला चुका दिसत आहेत का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.

विमान अपघातानंतर संबंधित कंपनीवर करण्यात आलेल्या प्राथमिक कारवाईवर अमोल मिटकरी समाधानी नसल्याचे त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. मिटकरी यांनी पोस्ट करून काही सवाल उपस्थित केले.

केवळ विमानांची उड्डाणे थांबवून उपयोग नाही, तर या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. दादांचा जीव गेल्यानंतर आता यंत्रणेला त्यातील तांत्रिक चुका दिसत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक

मिटकरी यांनी डीजीसीएला इशारा दिला. "फक्त विमानांची उड्डाणे थांबवून दादा परत येणार आहेत का? आमचा हा लढा इथेच थांबणार नाही. जर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर दादांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता आवरला जाणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिली.

'सत्यमेव जयते' म्हणत संघर्षाचा निर्धार

ट्विटच्या शेवटी त्यांनी "लढा इथून सुरू झालाय... सत्यमेव जयते!" असे म्हणत या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अजितदादांच्या अपघातावरून राजकीय वातावरण आता तापले आहे.