बारामतीतील ११ ज्येष्ठांचा ओडीशा राज्यात १३ मार्चला अपघात; महिलेचा मृत्यू, १० जखमींवर उपचार

बारामतीतील ११ ज्येष्ठांचा ओडीशा राज्यात १३ मार्चला अपघात; महिलेचा मृत्यू, १० जखमींवर उपचार

 

बारामती: बारामतीच्या जिरायती भागातील ११ ज्येष्ठ प्रवाशांना ओडीशा राज्यात अपघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये एका ज्येष्ठ महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मात्र,उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या तत्पर मदतीमुळे इतर जखमींना तातडीने वेळेवर उपचार मिळाले. बुधवारी (दि १८) सर्व प्रवासी माळवाडी(लोणी) गावी सुखरुप परतले आहेत.

माळवाडी येथील अलका दगडे, मिना दगडे, संगीता काळोखे, कानिक़नाथ बनकर, ताराबाई बनकर, बायडाबाई लडकत, माऊली सकाटे, नामदेव काळोखे, नंदा जगताप, लिलाबाई दयाळ, हेमा लोणकर हे सर्व प्रवासी ओडीसा राज्यातील येथील श्री जगन्नाथ पुरी आदी ठिकाणी धार्मिक सहलीसाठी बारामती येथून गाडीतून गेले होते. १३ मार्च रोजी या प्रवाशांच्या गाडीला बालासोर परीसरात रात्री ८ च्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर एका प्रवाशाने गावातील दगडे कुटुंबियांना संपर्क साधला. मात्र,अवघ्या काही वेळातच हा काॅल बंद झाला. यावेळी गावकऱ्यांना परत याच मोबाइलसह इतर प्रवाशांच्या मोबाइलवर रात्री ११ वाजेपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,समोरुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशीरा बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक  निलेश लोणकर यांना गावातील ज्ञानदेव बोरावके यांनी या अपघाताबाबतची माहिती दिली. लोणकर यांनी रात्री ११.१५ वाजता उशीरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यायलयाशी संपर्क साधला. यावेळी स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी संपर्क साधत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यावर परिस्थितीचे गांभीर्य पाहता उपमुख्यमंत्री कार्यालयाने अवघ्या दहा मिनिटात तातडीने या प्रवशांचे मोबाईल वरुल लोकेशनचा शोध घेत माहिती घेत मदतीसाठी सुत्रे हलविली. तसेच ‘लोकल आॅथोरीटी’च्या मदतीने जखमींना उपचारासाठी ओडीशातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली.

देवगिरी निवासस्थानावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील जखमींना मदतीसाठी लक्ष घातले. तसेच मुळ महाराष्ट्रातील आणि सध्या बालासोर येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी मयुर सुर्यवंशी यांना देखील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने संपर्क साधण्यात आला. जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी देखील जखमींना वेळेवर तत्पर उपचारासाठी स्वत: लक्ष घालत मदत केली. तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या. जखमींमध्ये बहुतांश प्रवाशांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. मात्र,दुर्दैवाने कटक येथे उपचार सुरु असताना महिला प्रवाशी संगीता काळोखे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी(दि १६) भुवनेश्वर येथून विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर रात्री वेढणी (ता.फलटण)या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.