बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?
मुंबई: महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि या वर्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी 'शेतकरी कर्जमाफी'ची घोषणा केली.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर आज सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्ती मिळणार आहे. या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, अटी आणि शर्ती काय आहेत आणि योजनेचे स्वरूप कसे असेल? याचा संपूर्ण माहिती जाणून घ्या...
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितामुळे कर्जमाफीची आज घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५६ लाख शेतकर्यांची कर्जमाफी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफीची अंदाजे रक्कम जवळपास ३६,००० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची चर्चा झाली. २० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा कसे होतील, यावर चर्चा झाली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ममाफाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आज यावर शिक्कामोर्तब झालं. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'चा अंतिम निर्णय घेण्यात आला. राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील, अशी माहिती मिळाली आहे.
संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यात दररोज सरासरी सात आत्महत्या होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकारी बॅंका, खासगी व ग्रामीण बॅंकांकडील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर केली आहे. कर्जमाफीचे निकषही पूर्वीप्रमाणेच असतील. आता ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.