“…तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की”, राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट चर्चेत!
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशातील पर्यावरणाची सद्यस्थिती आणि इतर महत्वाच्या विषयावर सविस्तर भाष्य केले. “पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललंय, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत”, असा इशारा देत राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली.
ती झाडं कुठे आहेत? – राज ठाकरे
“आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन म्हणला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९० टक्के झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा,”, असे राज ठाकरे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.
उन्हाच्या दाहकतेवर भाष्य
“२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?”, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
आकडेवारी मांडली
या राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये काही आकडेवारी देखील मांडली आहे. “यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७ टक्के जिल्हे ज्यात देशाची ७६ टक्के लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत. जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पावसामुळे शहरात आणि ग्रामीण भागात निर्माण होणारी स्थिती
“पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?”
जंगल जमीन
“बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.”
“१,७३,९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली,” असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सूचक इशारा
“आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.”
“आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.”
पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत?
“निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल,” असे राज ठाकरे म्हणाले.